
एखादा माणूस किती प्रतिभावंत असावा? विविध क्षेत्रात मुसाफिरी करणारी माणसं क्वचितच आढळतात. अशा माणसांच्या अंगी हे जे अष्टपैलू गुण असतात, ते वारसा हक्काने तर येतातच. शिवाय त्यांच्या कार्यकर्तृत्वातून त्यांच्या वर्तमानाला प्रकाशमय करून सोडतात. विशेष म्हणजे अशी माणसं समाजासाठी आदर्शवत दीपस्तंभ बनतात. असेच एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे आबासाहेब नारायणराव दळवी. तेजस्वी यशाची गरूडभरारी घेतांना त्यांना त्यांच्या शिक्षकी पेशात अनेक पुरस्कारांनी गवसणी घातली. विशेष म्हणजे सीमाभागातील राष्ट्रपती आदर्श शिक्षक मिळणारे ते पहिले मराठी शिक्षक ठरले. शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतरही विविध क्षेत्रातील त्यांचा दबदबा कायम आहे. ३० जुलै हा त्यांचा जन्मदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…
- चेतन लक्केबैलकर, संपादक
एककाळ होता जेव्हा गावपंचांनाही शिक्षकांचा शब्द टाळता येत नव्हता. गावाचा डोलारा शिक्षकांच्या इशाऱ्यावर चालायचा, त्यांचे निर्णय शिरोधार मानले जायचे. त्याकाळातील शिक्षक न्यायाने वागायचे, समाजाच्या जडणघडणीत योगदान द्यायचे. केवळ नोकरी करणं हे त्यांच्या प्रवृत्तीच्या आवाक्यात बसणारे नव्हते. समाजाला दिशा देण्यात कमी पडलो, तर मोठे पातक आपल्या हातून घडेल, अशी भावना शिक्षकांमध्ये होती. त्याकाळात आबासाहेब दळवी यांचे वडील नारायणराव दळवी, तालुक्याच्या खेड्यापाड्यात ज्ञानदानाचे कार्य करायचे. बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समितीचे ते त्याकाळातील शाळा तपासणी अधिकारी होते. त्यांनी अनेक गावात शाळा काढल्या.आपणही वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या योगदानाला हातभार लावावा असे कुणा मुलाला वाटणार नाही. आबासाहेबांनी केवळ वडीलांच्या पावलावर पाऊलच ठेवले नाही तर खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवण्याची किमया केली.

आबासाहेबांना प्राथमिक शिक्षण घेत असल्यापासून कब्बडीची आवड. शिक्षक झाल्यानंतरही त्यांनी कब्बडीची मैदाने गाजविली. राज्यस्तरापर्यंत त्यांच्या संघाने मजल मारली. केवळ मैदानी खेळातच नाही, तर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतून समाजाचे प्रबोधन करण्यात त्यांनी दिलेले योगदान आजही तालुकावासीयांच्या स्मरणात आहे. शिक्षक असूनही ज्याचा समाजाशी संबंध येत नाही तो केवळ नोकरदार असतो, आबासाहेब दळवी हे हाडाचे समाजवादी. सीमाप्रश्नाच्या चळवळीशी जवळून संबंध आला. सरकारी नोकरीत असतांनाही कधी त्यांनी मराठी भाषाभिमान बाळगण्यात कच खाल्ली नाही. त्यांच्या हितशत्रूंनी त्यावरून त्यांना अनेकवेळा खिंडीत गाठण्याचा प्रयत्नही केला. पण, मातीशी नाळ जुळलेले आबासाहेब मातीत लोळून निगरगठ्ठ बनले होते. त्यात ते कब्बडीपट्टू त्यामुळे त्यांनी प्रत्येकवेळी सहिसलामत सुटका करून घेतली.
ज्या गावात शिक्षक म्हणून सेवा बजावली, त्यागावात त्यांनी त्यांच्या पाऊलखुणा समाजकार्यातून सोडल्या. आजही त्यांच्या कार्याला आदर्श मानून पिढ्या घडताहेत. गावात कुणाचे लग्न, बारसे असो वा अगदीच कुणाच्या घरात मयत झालेले असो; आबासाहेब सर्वात पुढे असायचे. आजही निवृत्तीनंतर त्यांच्या या कार्यात खंड पडलेला नाही. तिरडी बांधण्यापासून उत्तरकार्य उरकेपर्यंत त्यांचा सहभाग असतो. त्यातून त्यांनी माणसं कमावली. अकेलाही चलाथा मंजिल ए गालीब, लोग मिलते गये और कारवा बनते गया, असा त्यांचा अनुभव थक्क करणारा आहे. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्थायीभाव. त्यामुळे अनेकवेळा त्यांच्यावर संकटे आली, पण आपल्या मतावर ठाम असणे, हीच यशाची पहिली पायरी असते, याची अनुभूती नेहमीच त्यांना येत गेली.
केवळ शिक्षक म्हणून नोकरी करणे त्यांच्या रक्तात नव्हते. शिक्षक नेते म्हणून त्यांनी शिक्षकांच्या समस्यांना अंगार फुलविला. प्रसंगी त्यांनी मस्तवाल राजकारण्यांना अंगावर घेऊन शिक्षकी पेशाचे स्वातंत्र आणि स्वायतत्ता जपली. शिक्षकांची पतसंस्था असेल, शिक्षक संघटना असेल, सेवेत असेपर्यंत त्यांचे वर्चस्व राहिले. निवृत्तीनंतरही आजच्या पिढीतील शिक्षक मंडळींना याकामी त्यांच्या मार्गदर्शनाची गरज भासावी, हे त्यांच्या कार्याचे संचीत आहे.

आबासाहेब दळवी यांनी शिक्षक म्हणून सरकारी नोकरी बजावतांनाही महाराष्ट्र एकिकरण समितीशी निष्ठा कायम ठेवली होती. त्यामुळे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर संधी असूनदेखील ते इतर कोणत्याही पक्षाकडे न जाता समितीच्या कार्यात सामील झाले. सध्या ते दुसर्यांदा समितीचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. अलिकडच्या आणीबाणीच्या काळात समितीची संघटनात्मक दिशा आणि आंदोलनासाठी त्यांचा पुढाकार नव्या पिढीलादेखील उर्जा देणारा आहे. अलिकडच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सहभाग घेत आपले मराठीपण जपले आहे. तालुका स्तरावर काम करतांना त्यांनी गावाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी कटाक्षाने घेतली आहे. अलिकडेच त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील श्री रवळनाथ मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरु आहे. या जिर्णोध्दार कमिटीचे ते अध्यक्ष आहेत.
श्री. आबासाहेब दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिध्द करण्यात आलेल्या ‘समांतर क्रांती’ ई-पेपरची लिंक..
कुटूंबवत्सल व्यक्तीमत्व
नोकरी-समाजकार्य करतांना एखाद्याचे सहजच कुटूंबाकडे दुर्लक्ष होऊन जाते. आबासाहेबांनी ही आघाडीदेखील लिलया सांभाळली. पत्नी अरूंधती यादेखील शिक्षिका, त्यांनीही दुर्गम अशा देगाव गावापासून त्यांच्या सेवेची सुरूवात केली. अनेक शाळांमधून ज्ञानदानाचे कार्य इमानेइतबारे केलेच, शिवाय आबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिक्षक संघटना, शिक्षकांची पतसंस्था यावर त्यांनी सदस्या, अध्यक्षा म्हणून काम करतांना शिक्षकाभिमूख निर्णय घेतले. दोघेही शिक्षक त्यामुळे बरीच ओढाताण झाली खरी, पण त्याचा कुटूंबावर परिणाम होऊ न देण्याचे कसब आजच्या नव्या पिढीसाठी परीपाठच आहे.

सहा मुली, एकुलता मुलगा असे कुटूंब. मुली आहेत, म्हणून शिक्षणाच्या बाबतीत कंजूषी करणे, आबासाहेब आणि अरूंधती या दांपत्याच्या कार्यकतृत्वाला शोभणारे नव्हते. किंबहूना, त्यांना त्यांच्या मुलींना उच्चशिक्षित करायचे होते. त्यांनी त्यांचे ध्येय गाठले. त्यांची मोठी मुलगी सौ. शितल यांनी (बी.ए.) पदवीचे शिक्षण घेतले असून त्या बेळगाव वार्ता या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादिका आहेत. सौ.तेजस्विनी यांनी (एमबीए, पीएमपी) व्यवस्थापन शाखेत पदवी प्राप्त केली असून पुण्याच्या एमर्सन ग्लोबल या मल्टिनॅशनल कंपनीत सिनीयर प्रोग्रॅम मॅनेंजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर अनेक देशांचा दौरा केला आहे. सौ.स्नेहल या एम.ए., एम.एड. असून त्या संजय घोडावत ग्रूपमध्ये शैक्षणिक समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. सौ.मिनल यांनी कला शाखेत पदवी प्राप्त केली असून एस.एम.व्ही.व्ही. एड्युटेकमध्ये त्या सीआरएम मॅनेजर आहेत. सौ. स्मितल यांनी एम.सी.ए.चे शिक्षण घेतले असून त्या कोच बिझनेस सल्यूशेन कंपनीत डाटा इंजिनीयर आहेत. सौ. किशोरी ही एम.एस्सी असून गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पॅथॉलॉजी डिपार्टंमेटची क्वालिटी मॅनेजर आहे.
सामाजिक भान आणि वास्तवाची जाण असलेले त्यांचे चिरंजीव प्रसादसिंह एम.एस्सी, एम.टेक असून एक्सेंचर मल्टीनॅशनल कंपनीत संशोधनाचे काम करतात. त्यांनी संशोधनासाठी परदेश दौरा केला आहे. तर स्नुषा सौ.गायत्रीदेवी, बी.सी.एस, सीडॅक डिप्लोमाचे शिक्षण घेऊन पुणे येथील विप्रो कंपनीमध्ये वरिष्ठ सहयोगी म्हणून कार्यरत आहेत. नातवंडांचा मोठा गोतावळा आबासाहेबांना लाभला असून त्यांच्यात रमतांना त्यांचा कुटुंबवत्सल स्वभाव खुललेला दिसतो.
सेवा आणि कार्य
- १९७५ साली नागुर्डा मराठी शाळा: उच्च प्राथमिक वर्गांना मंजूरी मिळविली.
- हलकर्णी मराठी शाळा: उच्च प्राथमिक वर्गांना मंजूरी मिळविली.
- मॉडेल मराठी शाळेचे मॉडेल मुख्याध्यापक
- मणतुर्गा या त्यांच्या गावी मुख्याध्यापक
- इदलहोंड येथे मुख्याध्यापक आणि सेवा निवृत्त
संघ, संस्थांतील कामगिरी
- १९८० ते २००४ पर्यंत अखिल भारतीय शिक्ष संघटनेचे खानापूर तालुकाध्यक्ष
- खानापूर तालुका सरकारी नोकर संघाचे राज्य परिषद सदस्य १९९५ ते निवृत्तीपर्यंत
- १९९० पासून खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे नेतृत्व
- खानापूर तालुका शिक्षक संघ गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, अध्यक्ष
- १९८० ते २००४ पर्यंत सरकारी कर्मचारी क्रीडास्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करून प्रत्येक वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
- यंग मराठा संघ मणतुर्गे या क्रीडा आणि नाट्यसंघाची स्थापना
- मणतुर्गा हायस्कूलच्या स्थापनेत सहभाग (१९९२)
- कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य
- जायंटस् ग्रूपचे संस्थापक सदस्य
- २००४ खानापूर तालुका शिक्षक प्रतिनिधी
- २०११ कर्नाटक राज्य अध्यक्ष, इंटरनॅशनल ह्युमन राईटस् जस्टीस फेडरेशन दिल्ली
- खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे ते सरचिटणीस
- खानापूर तालुका मल्टीपर्पज को-ऑप.सोसायटीचे चेअरमन
पुरस्कार आणि मानसन्मान
- १९९४-९५ सालचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार
- २००९-१० जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार
- प्रगती इन्स्टीट्यूट ऑफ कॉमर्सचा उत्तम कब्बडीपट्टू पुरस्कार
- २०१० गोवा राज्यस्तरीय शिक्षक भूषण पुरस्कार
- २०१० खानापूर तालुका पत्रकार संघाकडून सन्मान
- २०११ कोल्हापुरी बाणा शिक्षक भूषण पुरस्कार
- २०११ श्रमजिवी समाज गौरव, दपोली
- २०११ जनसेवा पुरस्कार, पुणे- जनसेवा कला अभियान महाराष्ट्र राज्य
- २०११ राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, दृष्टी फाउंडेशन पणवेल-रायगड
- २०११ डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार
- २०११ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार-जळगाव
- २०११ श्रमशक्ती एकता सेवा समिती इचलकरंजीचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार
- २०११ वैभव महाराष्ट्राचा गुणगौरव पुरस्कार, कोंढवा- पुणे
- २०११ छावा युवा पुरस्कार, पुणे
- २०११ समता साहित्य अकादमीचा (मुंबई) राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार
- २०११ भीमरत्न पुरस्कार, भीमराय कला अकादमी, परेल-मुंबई
- २०११ महाराष्ट्र भुषण पुरस्कार, ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया, मुंबई
- २०११ राज्यस्तरीय संकेत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, संकेत क्रीडा प्रतिष्ठाण, पुणे
- २०११ राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रगती महिला सामाजिक विकास संस्था, नाशिक
- २०११ मानवता पुरस्कार, सत्यम्-शिवम्-सुंदरम् ग्रूप, पुणे
- २०११ कोकण गौरव पुरस्कार, हुतात्मा अपंग बहूउद्देशिय विकास संस्था, कराड
- २०११ आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मृती, औरंगाबाद
- २०११ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकमित्र पुरस्कार बुध्दस्थान धुळे
- २०११ इंडियन प्राईड एज्यूकेशन पुरस्कार, अर्जून चॅरिटेबल फाऊंडेशन कोरेगाव-सातारा
- २०११ जनकल्याण गौरव पुरस्कार, जनकल्याण सामाजिक संस्था, कोल्हापूर
- २०११ श्रीमंत शाहू महाराज परिवर्तक पुरस्कार, पुणे
- २०११ विशाल पुरंदर राज्यस्तरीय पुरस्कार, पुरंदर-पुणे
- २०११ राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार, कै. रामकृष्ण धोंडीराम काकडे ट्रस्ट, बेडकीहाळ-चिकोडी
- २०११ साने गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार, जनसेवा कला-क्रिडा अभियान महाराष्ट्र राज्य
- २०१२ राष्ट्रीय तपोभूमी गोवा गौरव पुरस्कार
- २०१२ राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, साई प्रतिष्ठान पुणे
- २०१२ भारत सरकारच्यावतीने राष्ट्रपती पदक आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर २०१२ रोजी विज्ञान भवन नवी-दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती महामहीम प्रणव मुखर्जी आणि तत्कालीन केंद्रीय मणुष्यबळ मंत्री कपिल सिब्बल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
- २०१४ खानापुरातील लोकमान्य भवन येथे ७ सप्टेंबर २०१४ रोजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य एकसष्टी सोहळा साजरा करण्यात आला.

शाळेवर कोसळले झाड.. केवळ सुदैवाने अनर्थ टळला
समांतर क्रांती / खानापूर Tree fell on school.. Only luck saved disaster. शाळांमधील समस्यांमुळे आधीच विद्यार्थ्यांची पुरेवाट होत असतांना निसर्गाने सुध्दा प्रताप दाखविण्यास सुरूवात केल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. सोमवारी (ता. २८) नंदगड येथील जेसीएस आवारातील उर्दू शाळेच्या वर्गखोलीवर झाड कोसळल्याची घटना घडली. ही घटना रात्री घडल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला. नंदगड येथील जेसीएस आवारातील समस्यांमुळे […]