
समांतर क्रांती विशेष
खानापूर: हा तालुका म्हणजे सरकारी अधिकारी, त्यांचे स्थानिक दलाल आणि लोकप्रतिनिधींच्या सेवेचा आव आणणाऱ्या लाळपुस्यांचे कुरण झाला आहे. लोकप्रतिनिधी बदलतात, पण परिस्थिती जैसे थेच राहते. भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी आमदारकीची सूत्रे स्विकारून तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला. तरीही तालुक्यात कांही बदल होतील, अशी आशा राहिली नाही. तसे वातावरण त्यांनी स्वत:च निर्माण करून घेतले आहे. भलेही ते त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमाची जाहिरातबाजी करीत असतील. पण, प्रत्यक्षात मात्र त्यांच्या अवतीभवती गराडा घातलेल्या ‘बडव्यां’ना हटविण्याचे भाण त्यांना राहिलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील जनता ‘विठ्ठल्ला’ बडव्यांना हटविणार कधी? असा प्रश्न विचारीत आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून तालुकास्तरापासून विभागीय शासकीय कार्यालयांतील खूर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी ‘नेमेची येतो पवसाळा’ अशी झाली आहे. आमदार बदलले की होईल सुरळीत, अशी तालुकावासीयांची माफक आपेक्षा असते. ती आमदार विठ्ठल हलगेकर तरी धुळीला मिळविणार नाहीत असे वाटत होते. पण, ये रे माझ्या मागल्या अशीच स्थिती निर्माण होऊ पाहत असल्याने नागरीक त्रस्त होणारच!
पोलिस स्थानकातील अधिकारी बदलले, कांही प्रामाणिक कर्मचारीही बदलले पण ‘जयराम, जय जय राम’ करीत तालुकावासीयांना पिडणारा साधा कर्मचारी बदलावा वाटत नाही का तुम्हाला? त्याच्यामुळे तालुकाभर अवैध ‘धंद्यां’चे पेव फुटले आहेत. पोलीस लोकांच्या रक्षणासाठी आहेत की ‘नरभक्षक’ आहेत? असा प्रश्न सामान्यांना पडत आहेत. अलिकडची कांही प्रकरणे अर्थातच जी मांडवली करून आणि अपराध्यांना बिनदिक्कत न्याय देऊन परस्पर मिटविण्यात आली, त्यांची कल्पना विठ्ठलरावांना नसेल असे अजिबात नाही. नसेल तर त्यांचे लोकप्रतिनिधीत्व केवळ पक्षाची हाजी-हाजी करण्यासाठीच आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
शिक्षण खात्याकडून अक्षरश: हेळसांड सुरू आहे. आमदारांनी कानडीतून शपथ घेतली, कानडीतून बोलू लागलेत, इतपत सगळंच ठिक होतं. पण, आता दररोज एखादी मराठी शाळा बंद पडत असतांना त्यांनी त्यांच्या तोंडावर बोट ठेवावे, हे कांही बरं नव्हं! गेल्या कांही दिवसात तालुक्यातील दहाहून अधिक मराठी शाळा बंद पडल्या आहेत. कानडी शाळा का बंद पडत नाहीत? असा प्रश्न त्यांना का पडत नसेल? शिक्षण खात्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले अधिकारी आणि कर्मचारी हेच या पापाचे धनी आहेत, हे त्यांना माहिती असायला हवे. कारण, तेही एका शाळेचे मुख्याद्यापक राहिले आहेत. तरीही विठ्ठला, हे दिसत नाही का तुम्हाला?
महसूल घ्या, तालुका पंचायत घ्या, नगर पंचायत घ्या. कोणत्याही कार्यालयात जा. तुमच्या कागदपत्रावर वजन ठेवल्याशिवाय कागद हलण्याचे नाव घेत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम धाब्यावर बसविणारी ही रित कधी बदलणार? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. खरंच तुमच्याकडून ही आपेक्षा नव्हतीच म्हणा! पण ‘विठ्ठला’ने बडव्यांचा गराडा हटविल्याशिवाय हे शक्यही नाही.
आधी तुमच्या ‘बगलबच्च्यां’ना हटवा!
तालुक्यातील परिस्थितीची जाणिव आमदारांना आहेच, पण आधी त्यांनी त्यांच्या ‘बगलबच्च्यां’च्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घ्यायला हवी. सर्वसामान्य माणूस आमदार म्हणून श्री. हलगेकरांना कॉल करतो. तेव्हा तो कुणी दुसराच उचलतो. उत्तरेही बेशिस्त असतात. कारणे तर अशी दिली जातात की ती कुणालाच पटत नाहीत. आम्ही ९० हजार मते देऊन चूक केली का हो? असा प्रश्न तालुक्यातील जनतेला तुम्हाला विचारायचा आहे. पण, आधी तुम्ही कॉल तर घेतला पाहिजे. भ्रष्टचाराच्या गुन्ह्यातील आरोपींचे वारसदार तुमचे उत्तराधिकारी होतात. ‘वुमनाइज्ड’ कार्यकर्ते तुमचे स्टार प्रचारक होतात. ज्यांच्यावर पोलीस खाते ‘हद्दपारी’चा दावा करणार ते तुमचे भाषण लिहून देतात. हे सगळं सामान्य जनतेला माहिती होतंच. तरीही तुम्ही ‘बडव्यां’ना हटवत नाही. याचा अर्थ काय? विठ्ठल बाटला असेच तालुकावासीयांनी समजायचे का?
संधी आहे, त्याचे सोने करता येते. पण, इच्छाशक्ती आणि एखाद्या अतिमहत्वाकांक्षी व्यक्तीच्या आहारी जाण्यामुळे आमदार होऊनही कांहीच पदरी पडणार नाही याची जाणिव होत नसेल, तर त्या आमदारकीलाही कांही अर्थ राहणार नाही. याची शिकवण वयाच्या ६० वर्षांपर्यंत विद्यादान केलेल्या माणसाला देण्याचा बेमूवर्तपणा तालुक्यातील जनता करणार नाही. पण, ती अद्दल मात्र घडवू शकते हे तुम्हालाही माहिती आहेच. विठ्ठला.. बडवे कधी हटविणार?


नाथाजिरावांचे कार्य कर्तृत्व अविस्मरणीय: प्रा. जे.बी.अंची
समांतर क्रांती वृत्त खानापूर: नाथाजीरावांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे. केवळ शून्यातून स्वप्नवत विश्व निर्माण करण्याची किमया त्यांच्या कार्यामुळेच ‘मराठा मंडळ’ या संस्थेने साधली आहे. कर्नाटकात नावाजलेल्या संस्थांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा मान नाथाजीरावांच्या अचाट कर्तृत्वामुळेच ‘मराठा मंडळ’ या संस्थेला मिळाला आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वावर जगत स्वतःला संस्थेच्या कार्यात समर्पित करत सतत संस्थेच्या […]